बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये संपूर्ण देशातून लोक येऊन वास्तव्य करत असतात. लोकांना तिथे आपलं घर निर्माण करुन वास्तव्य करण्याची संधी देऊन चूक केलीये का ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफ़ुल्ल पटेल यांनी राज्यसभेत केला आहे. राज्यातील कोरोना स्थितीवर बोलताना त्यांना अप्रत्यक्षपणे कंगनाच्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं.
आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का ? असा संतप्त सवाल यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी विचारला. तसेच महाराष्ट्रा बद्दल बोलायचं झाल्यास मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. संपूर्ण देशातील लोकांना या ठिकाणी घर निर्माण करण्याची संधी देऊन या शहरांनी चूक केली आहे का ? त्यांच्यावर टीका होणार का ? आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का ? असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले, कोरोनाविरोधातील लढाईची सुरुवात केंद्राच्या आदेशांच पालन करतच सर्व राज्यांनी केली. आता अनलॉक प्रक्रिया देखील केंद्रीय गृहमंत्रालयाकूडन येणाऱ्या गाईडलाईन्सनुसारच होत आहे. जर आपण सर्वजण एकत्र लढत आहोत तर आरोप-प्रत्यारोप करण्याची गरजच काय आहे, असे मत त्यांनी व्यक्त केलं.
पटेल पुढे म्हणाले, आज अनेक समस्या आहेत. ऑक्सिजन सिलिंडर आणि रेमिडीसेवेरची कमतरता आहे. सामूहिकपणे याचा सामना न केल्यास समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. राज्य सरकारांकडे आज निधीची कमरतता असून त्याची अनेक कारणं आहेत. केंद्राकडून मिळणारा जीएसटी अद्याप मिळालेला नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.