कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणीस स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी उठवायची हा विधिमंडळाचा अवमान आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील सव्वादोन कोटी ग्राहकांची चेष्टा चालविल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना केला आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळातील 6 महिन्यांचे घरगुती वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. 19) राजव्यापी महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
गेल्या दोन- तीन महिन्यांपासून घरगुती वीजबिल माफ करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, शिवसेना, माकप, शेकाप, जनता, दल, जनसुराज्य आदी पक्ष आणि संघटनेच्यावतीने आंदोलन सुरु करण्यात आले आहे. केरळ, मध्यप्रदेश व गुजरात आदी राज्यांनी घरगुती वीज बिलांमध्ये 6 महिन्यांसाठी 50 टक्के सवलत दिली आहे. कर्नाटक सरकारने रिक्षाचालक, टॅक्सीचालक, फळभाजी विक्रेते, बांधकाम व यंत्रमाग कामगार घटकांना रोख मदत दिली आहे. मात्र ठाकरे सरकारने काहीच केले नसल्याची बाब खेदजनक असून सरकारला जागे करायचे आहे. दरम्यान वीज बिलाप्रश्नी बुधवारी (दि.17) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वपक्षियांना घेऊन चर्चा करणार असल्याचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले. मुख्यमंत्री यावर निश्चितच तोडगा काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.