अकोला : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांना हार पत्करावी लागली होती आणि ही हार सरळसरळ वंचितमुळे झाल्याचे निष्पन्न झालं आहे त्यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वंचित बहुजन आघाडीबरोबर येण्याचे आमंत्रण दिले होते; परंतु त्यांनी काँग्रेस आघाडीला प्राधान्य दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना आमच्यासोबत यायचे असेल, तर त्याबाबतचा निर्णय त्यांनी घ्यावा, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे सांगितले.
दरम्यान , लोकसभा निवडणूक निकालानंतर वंचित’मुळे पराभव झाल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले होते.त्यासंदर्भात अॅड. प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची बोलणी सुरू होती, त्यावेळी आम्ही राजू शेट्टींना वंचित सोबत येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु त्यांनी काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले. त्यामुळे आम्ही हातकणंगले मतदारसंघात वंचितचा उमेदवार उभा केला. त्या ठिकाणी राजू शेट्टी यांचा पराभव कोणामुळे झाला, यावर मी भाष्य करणार नसल्याचेही आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
लोकसभेत झालेल्या चुका टाळून आगामी विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. याबाबतचा निर्णय मात्र सर्वस्वी त्यांनीच घ्यावा, असे अॅड. आंबेडकर म्हणाले.