कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पचवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत पराभव विसरून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले आहे. आंबा (ता. शाहूवाडी) येथे झालेल्या कार्यकर्ता अभ्यास शिबिरात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ठेच लागली म्हणून पायाचा अंगठा कापून ठेवायचा नसतो, तर ती जखम बरी करून पुन्हा जोमाने कामाला लागायचे असते. माझ्या पराभवामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढळला असेल. मी पराभवाच्या दु:खाला कवटाळून बसलो असलो तर देशातील शेतकरी आभाळाकडे आशाळभूत नजरेने बघत हतबल झाला असता असे शेट्टी यांनी सांगितले. आगामी विधानसभेसाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लोकसभा निवडणुकीतील आढावा अभ्यास शिबिर आयोजित केले होते. लोकसभेत झालेल्या चुका त्यांची कारणमीमांसा व विचारमंथन, सध्या सत्तेत असलेल्या युती सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, त्याचे परिणाम, आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीची भूमिका, आंदोलनाची दिशा या विविध विषयावर चर्चा झाली.
लोकसभेनंतर मी राज्यामध्ये जवळपास २ हजार किलोमीटरचा दुष्काळ दौरा केला. युती सरकारने शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याने व राज्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटे वाढल्यामुळे दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांंनी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे असे आवाहन त्यांनी केले.