मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता यामध्ये राज ठाकरे यांनी उडी घेतली. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपल्या कवितेतून राज यांच्यावर निशाणा साधला. ” राज तुम्ही करू नका जास्त नखरे कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे “, अशी कविता करत आठवलेंनी आपल्या भाषणातून राज यांच्यावर टीका केली. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
काँग्रेस पक्षाने मोदी सरकारच्या विरोधात ५६ विरोधक पक्ष एकत्र करून महाआघाडी स्थापन केली आहे. ५६ विरोधकाबरोबर आता ५७ नंबरला राज ठाकरे आले तरीही काही फरक पडणार नाही अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली. सभेला गर्दी करण्याच्या नियोजन राज ठाकरेंकडे आहे पण उमेदवार कसे निवडून आणायचे हे नियोजन आमच्याकडे आहे असा टोला आठवलेंनी लागवला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आठ दिवस राज ठाकरे गुजरात मध्ये राहून आले. गुजरात मधील विकास कामांची स्तुती केली. महाराष्ट्र सरकारने गुजरात सरकारची भूमिका स्वीकारावी असे राज म्हणाले होते. मात्र तेच राज ठाकरे आता पंतप्रधान मोदींवर आज टीका करत आहे. बाळासाहेब ठाकरे सुद्धा टीका करायचे पण अशा टीका त्यांनी कधी केली नाही अशी आठवण आठवलेंनी करून दिली.