मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूतने केलेल्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत जो वाद उसळला आहे त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला आहे. या वादाच्या अनुषंगाने यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशा आशयाच्या बातम्याही काही ठिकाणी प्रसारित झाल्या. मी इथे स्पष्ट करु इच्छितो, या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे ठाकरे यांनी सांगितले आहे.
सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण हिंदी सृष्टी हळहळली. मात्र त्यानंतर हिंदी सिनेसृष्टीत कलाकारांवर कसा अन्याय होतो. घराणेशाही कशी चालते याबाबत अनेक लोकांनी भाष्य करण्यास सुरुवात केली. सगळ्या वादात काही बातम्या समोर आल्या होत्या. ज्यामध्ये कलाकारांवर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशी काही वृत्त प्रसारित करण्यात आली.
#राजठाकरे #मनसेभूमिका #HindiFilmIndustry #SushantSinghRajput #MNS #RajThackeray pic.twitter.com/pUD1boTnSO
— Raj Thackeray (@RajThackeray) July 4, 2020
या सगळ्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत भूमिका मांडली आहे. ज्यामध्ये सुशांतच्या आत्महत्येमुळे निर्माण झालेल्या वादाचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा किंवा पक्षाच्या कुठल्याही शाखेचा काहीही संबंध नाही असं स्पष्ट केलं आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर उसळलेल्या वादानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंची या वादावरची प्रतिक्रिया समोर आली आहे.