मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याच्या कामाला वेग देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली. या निर्णयाची अनेक संघटनांकडून प्रशंसा करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाचे हार्दीक स्वागत केले असून केंद्रीय मंत्रीमंडळाचे मनापासून अभिनंदनही केले आहे.
या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिर उभारणीला वेग येईल असेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच अधिवेशन घेतले त्यावेळी पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलून तो भगवा केला, हिंदुत्ववादी विचारसरणीला पाठिंबा दिला. देशात घुसखोरी करुन आलेल्या पाकिस्तानी, बांगलादेशी नागरिकांना येथून हाकलून द्या या मागणीसाठी आठ फेब्रुवारीला मनसे मोर्चा काढणार आहे.
मराठी माणसाचे हित आणि हिंदुत्त्वाकडे झुकलेली भूमिका राज ठाकरे पुन्हा घेत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि मनसे हे दोघेही वैचारिक दृष्ट्या अधिकाधिक जवळ येत असल्याचे मानले जात आहे. त्यातच आज राम जन्मभूमी बाबत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे राज ठाकरे यांनी केलेले स्वागत महत्त्वाचे मानले जात आहे.