Raj Thackeray On Ajit Pawar | राज ठाकरेंचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले – ” लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते तर…”

मुंबई: Raj Thackeray On Ajit Pawar | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसेच, राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात सभाही घेतल्या होत्या. दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे.
दरम्यान वांद्रे येथे मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर भाष्य करत पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी त्यांनी लाडकी बहीण (Majhi Ladki Bahin Yojana) आणि लाडका भाऊ योजनेवरून (Ladka Bhau Yojana) खोचक टीका केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, “आपल्याकडे पाण्याच्या, आरोग्य आणि रोजगाराच्या मूळ प्रश्नांवरती बोलायला वेळ नाही. आमच्याकडं काय सुरुए? तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला पाहिजे त्यासाठी? या योजनांसाठी राज्य शासनाकडं मुळात पैसे आहेत का? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत आणि एकदम कुठले खड्डे बुजवणार आहेत ” , अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राज्य शासन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील मूळ प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेचे आहे. हेच येणाऱ्या विधानसभेत तुमचा प्रचार आणि पक्षाचं कॅम्पेन असलं पाहिजे असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
ते पुढे म्हणाले, ” आज तुम्हाला बैठकीला बोलावण्याचे महत्वाचे कारण म्हणजे हे जे सर्व्हे वैगरे असतात ना? ते नेमके कुठे फिरतात काही माहिती नाही. पण सर्व्हेसाठी येणारे लोक तुम्हाला भेटतील काय मुळात परिस्थिती आहे त्यांना समजावून सांगा. काय गोष्टींचं गणित घडू शकतं याचा नीट विचार करा.
यानंतर निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना मनसेकडून तिकीटं दिली जातील. तिकीट मिळाल्यानंतर मी पैसे काढायला मोकळा असं वाटणाऱ्या कोणालाही तिकीटं दिली जाणार नाहीत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होणार आहे ते न भुतो न भविष्यतो असं असणार आहे.
मला कोणीतरी सांगितलं की मनसेतील काही पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांना मी स्वतः रेड कार्पेट घालतो की जा म्हणून. कारण भविष्याचा जो सत्यानाश करुन घ्यायचा आहे तो घ्या. कारण त्यांचंच काही स्थिर नाही, लोकसभेला काय झालंय माहिती आहे ना?”, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
Comments are closed.