मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजपचे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता निवडणुक अधिकारी यांनी त्यांचा अर्ज आता वैध ठरवला आहे. राधाकृष्ण विखेंनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार केले. त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा विरोधकांनी केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच त्यांनी अर्जामध्ये स्वतःसह अन्य प्रतिनिधींचे ३ असे एकुण ४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेतला होता. ज्या वकिलांकडे हे प्रमाणपत्र बनवण्यात आलं, त्यांचा नोटरी करण्याचा परवाना २०१६ मध्येच संपला असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. याबाबत शिर्डी विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही दाखल झाली होती.
शिर्डीतील विधानसभा मतदारसंघासाठी विखे हे सर्वात अधिक मोठे दावेदार आहेत. अशावेळी त्यांच्याच उमेदवारी अर्जावर गंडांतर आल्यामुळे विखे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या आक्षेपावर निर्णय घेत त्यांचा अर्ज वैध ठरवला आहे.
Visit : bahujannama.com