पुरंदर : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनामुळे अनेकांची कामे बंद पडली असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कुटूंबियांच्या मदतीसाठी वन अर्थ सोशल फाऊंडेशच्या अध्यक्षा वैजयंता महेश गजरे यांनी धाव घेतली असून, अनेक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.
गेल्या २ वर्षांपासून अनेक कुटूंबे घरीच बसली आहेत. गेल्या २ वर्षापासून हजारो कुटूंबियांना विधवा, निराधार, गरजू, गरीब आदींना फाऊंडेशनच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.
वन अर्थ सोशल फाऊंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा वैजयंता महेश गजरे यांच्या वतीने व पुरंदर तालुका पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य व पत्रकार चंद्रकांत चौंडकर यांच्या सहकार्यातून पुरंदर तालुक्यातील कोरोना संकट काळात नायगाव गावातील विधवा महिला, परितक्ता व गरिब अशा काही कुटूंबास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यासाठी टीम फॅब फाऊंडेशनचे कुमार अजवाणी तसेच प्रिती नायर, प्रविण बोरसे, अमोल आबनावे, विपुल शेहगल, दत्तात्रय ताम्हाणे आदी दानशूर व्यक्तींनी मदत केली.
वैजयंता महेश गजरे यांनी वन अर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हे कार्य केले. वन अर्थ फाऊंडेशन हे अनेक वर्षांपासून समाजउपयोगी कार्यक्रम करीत आहे. नंतरच्या काळातही हे कार्य सुरूच राहणार असल्याची माहिती वन अर्थ सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैजयंता गजरे यांनी दिली.
कोरोना या महाभयंकर साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या काही दिवसापासून संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. परिणामी जनजीवन ठप्प झाले आहे. कोरोना संक्रमण काळ अतिशय वाईट काळ असून त्यात विधवा, गोरगरीब आणि कष्टकरी वर्गांची चांगलीच तारांबळ उडत आहे. अशा काळात कोणीही उपाशी राहू नये, या उद्देशाने वन अर्थ सोशल फाऊंडेशन त्यांचा आधार बनून हरवत चाललेल्या माणसात माणुसकीचे दर्शन घडवत आहे. फाऊंडेशनचे उपक्रम हे वंचित, गरजू, गरिबांना न्याय देण्याची भूमिका आहे. आशा काळात गरजूंना दिलेला आधार महत्त्वपूर्ण आहे.
याकामी नायगावचे सरपंच हरिदास खेसे, उपसरपंच दत्तात्रय दरेकर, सदस्य बाळासाहेब कड, सुभाष चौंडकर, मनीषा कड, आशा खेसे, भारती चौंडकर, निलोफर सय्यद, शिवांजली पाटोळे, ग्रामसेवक अमित टिळेकर, पोलीस पाटील ज्योती चौंडकर, संतोष गायकवाड, दत्तात्रय जाधव आदींचे सहकार्य लाभल्याचे चंद्रकांत चौंडकर यांनी सांगितले.