बहुजननामा ऑनलाइन – रिक्षा चालकाला प्रवासी म्हणून बसलेल्या तिघांनी चाकूच्या धाकाने लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यांना येरवडा ब्रिजपासून हवेली तालुक्यातील वळती येथे नेहून लुटले. याप्रकरणी इसरार उस्मानी (वय 45, वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. दरम्यान ऑगस्ट महिन्यात रात्री ते रिक्षा स्टॉपला थांबले असता गडबडीत आकरा वाजण्याच्या सुमारास तीन तरुण त्यांच्या रिक्षात बसले. त्यातील एकाने लवकर चला माझ्या भावाचा अपघात झाला असून, त्याला ससून रुग्णालयात दाखल केले सल्याचे त्यांना सांगितले.
त्यानंतर त्यांना त्याचे कपडे व इतर सामान आणायचे असून, तुम्ही रिक्षा उरुळी कांचन येथून घ्यायचे असल्याचे सांगून त्यांना नेले. मात्र मध्येच अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना वळती गावाच्या हद्दीत गेल्यानंतर रिक्षा थांबवून चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांच्याजवळील 7 हजारांची रोकड व मोबाइल असा ऐवज काढून त्यांना सोडून देण्यात आले. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी रिक्षा चालक यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली. लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो पुढील तपासासाठी येरवडा पोलिसांकडे वर्ग केला आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.