बहुजननामा ऑनलाइन टीम – सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडवणे आणि त्यांना आधार देण्याचे काम पोलिसांनी केले पाहिजे. सामान्यांच्या सेवेसाठी पोलीस आहेत, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल(Director General of Police Subodh Jaiswal) यांनी व्यक्त केले. त्यासोबत कोरोना काळात राज्यातील पोलिसांचे काम कौतुकास्पद आहे. कायदा-सुव्यवस्था सांभाळताना राज्यातील २९५ पोलिसांचा काेरोनामुळे मृत्यू झाला आहे, असे सांगितले.
पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्राच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या ‘पोलीस वस्तू संग्रहालय’ आणि “कॉमन मॅन पोलीस मैत्री शिल्पाचे” उद्घाटन जयस्वाल यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) संजयकुमार, अतुलचंद्र कुलकर्णी, अश्वती दोरजी, निवृत्त पोलीस महासंचालक वसंत सराफ, उषा कृष्णन, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, कृष्ण प्रकाश आदी उपस्थित होते.
यावेळी वसंत सराफ लिखित ‘पोलीस नेतृत्वाची कला’, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ लिखित ‘गुणवत्तापूर्ण तपासाची चेकलिस्ट’, विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे लिखित ‘आर्थिक गुन्हे का ? कसे? उपाय ’ या पुस्तकाचे प्रकाशन जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.
जमिनीच्या व्यवहारात आर्थिक फसवणुकीचे मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत आहेत. हे गुन्हेगार ग्लोरिफाय केले जातात. गुन्हेगारांचे सामाजिक दैवीकरण केले जात आहे. नवी पिढी त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहते हेच मोठे आव्हान आहे, असे मत यावेळी बोलताना अॅड. शिशिर हिरे यांनी मांडले.
उषा लक्ष्मण म्हणाल्या, पोलीस जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. कोविड काळात त्यांनी केलेले काम निश्चितच उल्लेखनीय आहे. आर. के. लक्ष्मण जरी राजकीय व्यंग्यचित्रांसाठी प्रसिद्ध असले तरी पोलिसांचा जनतेकडे पाहण्याच्या दृष्टिकाेनावर त्यांनी निरीक्षणातून उत्तमपणे भाष्य केले आहे. आर. के. लक्ष्मण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पोलीस आणि कॉमन मॅनला दिलेला हा सन्मान आहे.
पोलीस वस्तू संग्रहालय मुंबईत सुरू करण्याचा मानस होता. मुंबईपूर्वीच पुण्यातील पोलीस संशोधन केंद्रात वस्तू संग्रहालय सुरू झाले. वस्तू संग्रहालयात मांडलेल्या वस्तूंमधून पोलीस दलाचा वारसा उलगडतो. हे वस्तू संग्रहालय शालेय तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांनी जरूर पाहावे, असे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी सांगितले.