पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया टप्प्या टप्प्याने सुरु होणार आहे. सध्या निर्बंध शिथिल करण्यात आल्याने नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. अशीच गर्दी वाढत राहिली तर नाईलाजास्तव काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना punekars दिला आहे.
कोरोना नियमांचे पालन करा, अन्यथा
नागरिकांनी गर्दी करुन नये, कोरोना रोखण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करताना अजित पवार यांनी गर्दी कमी करण्यास सांगितले. गर्दी कमी झाली नाही तर एका बाजूची दुकाने दिवसाआड सुरु ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. जर हे टाळायचे असेल तर नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. तसेच गर्दी करु नये, असे आवाहन केले. पुणेजिल्हा परिषदेत शिवराज्यभिषेक कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोरोना अजून संपलेला नाही
शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. सध्या शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला, याचा अर्थ कोरोना संपला आहे असा होत नाही. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले.
अन्यथा एक दिवसाआड दुकाने सुरु ठेवणार
मागील अनेक दिवसांपासून सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे लोक कंटाळले आहेत. त्यांची अनेक कामे रखडलेली आहेत. त्यामुळे लोक घराबाहेर पडत आहेत. शहरातील दुकाने सुरु करताना व्यापाऱ्यांशी चर्चा करुन दुकाने सुरु करण्यात आली. परंतु सध्या या दुकानांसमोर गर्दी होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे नाईलाजाने एका बाजूची दुकाने दिवसाआड सुरु ठेवावी लागतील. यासंदर्भात व्यापाऱ्यांशी पुन्हा चर्चा केली जाईल. ही वेळ येऊ न देण्यासाठी व्यापारी आणि नागरिकांनी गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
आम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेणार
आगामी काळात राज्यातील महापालिकेच्या निवडणूका होणार आहे. या संदर्भात वॉर्ड रचनेबद्दल अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मुंबई महापालिकेत एक वॉर्ड पद्दत आहे. तर पुणे शहरात चार वॉर्ड पद्धत आहे. युती सरकारमध्ये त्यांना जे योग्य वाटले त्यानुसार त्यांनी वॉर्ड रचना केली. आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. आम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय घेतला जाईल.