बहुजननामा ऑनलाइन टीम – आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात (Ajit Pawar)सुरु आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) पुण्यात सुचक वक्तव्य केलं आहे. वारं बदलतं तसं काहीजण बदलतात, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार म्हणाले, मागील काळात संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांचा झंझावात पहायला मिळाला. त्या एकट्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार भारतात आलं. आणि त्याच नेत्याच्या नावाखाली अनेक राज्याही त्यांच्या ताब्यात गेली. अशा अनेक महापालिकाही गेल्या. पण आता परिस्थिती बदलली आहे. असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
वारं बदलतं तसं काहीजण बदलत असतात, मागे आमचं सरकार गेल्यानंतर आमच्यातले काही जण भाजपमध्ये गेले. पक्ष बदणाऱ्यां नेत्यांना पक्षनिष्ठा वगैरे काहीही नसते. त्यांच्यात कदाचित एक ध्येय असतं आपल्या प्रभागाचा व गटाचा विकास व्हावा. पण कामं कशी होणार, सत्ताधारी पक्षातून निवडून आलं तरच काम होतील. म्हणून जर त्यावेळी गेले असतील आणि आता जर वेगळा विचार करुन परतत असतील तर त्यांचा स्वार्थ नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं.