बहुजननामा ऑनलाइन टीम – सध्या अभियांत्रिकी, फार्मसी, एल.एल.बी.च्या प्रवेश प्रकिया सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाच्या प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना (Admission of students)प्रवेश प्रकियेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. त्यामधून ही काही जागा रिक्त राहतात. अशा रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नागरिक कृती समितीचे अध्यक्ष सुरेश जैन, शैलेश बडदे, वसंत गांधी, निलेश बधे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे संकट सुरु असून शाळा महाविद्यालये सुरु होऊनही बहुतांश विद्यार्थी वर्गात जाण्यासाठी धजावत नाहीत. अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षाही कोरोना संक्रमणकाळात झालेल्या आहेत. हजारो विद्यार्थ्यांची इच्छा असूनही कोरोनाच्या भीतीपोटी प्रवेश परीक्षा दिल्या नाहीत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय झाले असून रिक्त जागांवर त्वरीत प्रवेश देण्यात याव्यात. हजारो परदेशी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्रात येतात. या विध्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा देण्याची अट नाही. प्रवेश परीक्षा न दिल्याने चिंताग्रस्त झालेल्या या हजारो विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण संचालक आणि सीईटीचे संचालक यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे जैन यांनी सांगितले.