पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कात्रज परिसरातील गुजरवाडीमध्ये झालेल्या खूनप्रकरणाचा गुन्हे शाखेने छडा लावत दोघांना अटक केली आहे. मुख्य आरोपी हवेली तालुक्यातील पेंजर गावचा माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. तर तो माजी सरपंच देखील आहे. ज्याचा खून करण्यात आला तो या ग्रामपंचायत सदस्याच्या मामीचा सख्खा भाऊ होता.
विकास रमेश चव्हाण (वय 31, रा. सर्वे नंबर 32, गुजरवस्ती, कात्रज) व सचिन जालिंदर डाकले (वय २९) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मोहन चौंडकर (वय 35) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत मोहन यांची पत्नी पूजा यांनी तक्रार दिली आहे.
विकास याची मामी ही मोहन याची सख्खी बहीण आहे.. विकासला लहान पणापासून मामा आणि मामीने वाढविले होते. विकास मूळचा हवेली तालुक्यातील पेंजर गावचा आहे. तो ग्रामपंचायत सदस्य आहे. तर पाच वर्षे सरपंच देखील होता. दरम्यान, विकास याने मोहन यांना मांगडेवाडी परिसरातील खलाटेनगर भागात काही वर्षांपूर्वी एक गुंठा जमीन घेऊन दिली होती. त्यावेळी मोहन यांनी येथे लाईट आणि पाण्याची सुविधा देखील तूच करून द्यायची असे सांगितले होते. विकास याने देखील करून देतो असे सांगितले होते. नेमके हे गाव पुणे महापालिकेत आले. त्यात काम काही झाले नाही. पण, मोहन यांनी येथे घर बांधले आहे. त्यामुळे विकास याने शेजाऱ्याकडून त्यांना लाईट मीटर आणि पाण्याचे कनेक्शन मिळवून दिले. तरीही मोहन हे अधूनमधून यावरून वाद घालत होते.
त्याच दरम्यान विकास याच्या मित्राने मोहन यांच्या शेजारी प्लॉट घेतला. त्या प्लॉटचे बांधकाम सध्या सुरू आहे. मोहनचा खुन होण्यापुर्वी विकास व त्याचा मित्र सचिन हे याठिकाणी रात्री आले होते. यानंतर ते दोघे दारू पिण्यास बसले. दारू पित असताना मोहन देखील तेथे आला. त्यांनी सोबत दारू पिली. यानंतर मोहन याने पुन्हा मीटर आणि इतर सुविधा दिल्या नाही, म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. यातून त्यांच्यात वाद झाला. यावेळी मोहन याने त्या दोघांना विटा मारल्या. यातून ढकलाधकली झाली व मोहन हे खाली पडले. यात त्यांना जखम झाली. यानंतर आरोपींनी मोहन याच्या चेहऱ्यावर विटा- दगड मारून त्याचा खून केला नी पसार झाले.
हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. भारती विद्यापीठ पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी अज्ञात असल्याने आणि खून का झाला हे समजत नसताना गुन्हे शाखेने अत्यंत खलातली माहिती काढली. यावेळी खंडणी विरोधी पथकाला खून करून दोन आरोपी हे शिरवळ रोड सातारा याठिकाणी निघून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी
गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी दोघांना भारती विद्यपीठ पोलिसांचे ताब्यात दिले आहे.ही कारवाई अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक निरीक्षक संदीप बुवा, कर्मचारी पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, अश्विनी केकान, अमर पवार यांच्या पथकाने केली आहे.