पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्याच्या पूर्व भागातील नागरिकांना शुद्ध आणि पुरेसे पाणी द्या आणि मग मीटर रीडिंग करावे. येथील नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी येते, काही ठिकाणी पाणीच मिळत नाही, ज्या ठिकाणी मीटर आहे, तेथे पाणी येत नाही, तर मीटर रीडिंग कशाचे करणार आहेत. नागरिकांना शुद्ध आणि पुरेसे पाणी दिल्यानंतर मीटर रीडिंग केले तर कोणाचीही हरकत नाही. मात्र पालिका प्रशासन सुविधा देणार नाही आणि न केलेल्या कामाची म्हणजे पाण्याच्या मीटरची तपासणी करण्यासाठी टेंडर काढून जाहिरात कशासाठी दिली, असा संतप्त सवाल ससाणेनगर नागरी कृती समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
पालिकेच्या करामध्ये पाणीपट्टी प्रत्येक नागरिक भरत आहे. मग आता मीटर रीडिंगचे पैसे कसले घेणार आहेत. काळेपडळमधील ओंकार कॉलनी, गुरुदत्त कॉलनी, म्हसोबानगर, नेहरूनगर आदी परिसरातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याचा टँकर आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांनी पाणी घरामध्ये कसे न्यायचे हा गंभीर प्रश्न आहे. याबाबत वारंवार हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय आणि लष्कर पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारअर्ज आणि विनंत्या केल्या आहेत. मात्र, अद्याप पाणीपुरवठा यंत्रणेमध्ये कोणताही बदल झाला नाही, असे येथील नागरिकांनी सांगितले.
ससाणेनगर नागरी कृती समितीचे मुकेश वाडकर म्हणाले की, पालिका प्रशासनाने करामध्ये पाणीपट्टी समाविष्ट केली आहे. त्याप्रमाणे नागरिक कर भरत आहेत. आता पालिका प्रशासन पाण्याच्या मीटरचे रीडिंग करून पुन्हा पाणीपट्टी वसूल करणार की काय अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे. हडपसर गावातील जलवाहिनी जीर्ण झाली असून, ती दुरुस्त करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता पावसकर, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील (प्रभाग क्र.23) पाणीपुरवठा अधिकारी आगरकर यांनी सांगितले की, हडपसरमधील जीर्ण झालेली जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी पुणे महापालिकेकडे निधी उपलब्ध नाहीत. पालिकेकडे पैसे नाहीत म्हणून नागरिकांकडून दुप्पट वसुली करणार की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीने नागरिक बेजार झाला आहे. त्यात पालिका प्रशासन सुविधा न देताच वसुलीचा नवा फंडा वापरत असल्याचे चित्र सध्या तरी उघडकीस येऊ लागले आहे. हडपसरवासियांना पाणी मिळत नसले तरी शहरातील कचऱ्याचा त्रास दिला जात आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथे कचऱ्याचे डोंगर झाले आहेत. कचऱ्यामुळे या परिसरातील जलस्रोत खराब झाले आहेत. आरोग्याच्या समस्या गंभीर बनत आहेत. तरीसुद्धा पुन्हा रामटेकडी येथे कचरा प्रकल्प सुरू करून आणखी एका समस्येमध्ये भर टाकण्याचे काम पालिका प्रशासनाने इमानेइतबारे केले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रशासनाने किमान मुलभूत सुविधा तरी द्याव्यात, एवढीच माफक अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे, असे त्यांनी सांगितले.