बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यातील ठाकरे सरकार मला काही अस्थिर वाटत नाही. त्यांच तेच पडेल, जेव्हा पडेल तेंव्हा पडेल. पडले नाही तरी आम्हाला काही देणं घेणे नाही. आम्ही राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून (MP Girish Bapat) काम करत आहोत आणि तसेच काम करत राहणार असल्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी म्हटले आहे.
खासदार बापट पुण्यात माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, शेतक-यांच्या जीवनात बदल घडविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने कृषी कायदा केला आहे. तो रद्द होणार नाही. पण त्यामध्ये काही सुधारणा केल्या जातील. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये डाव्या विचारसरणीचे लोक सहभागी झाले आहेत. हे सरकार अस्थिर करण्यासाठी काम केले जात आहे. या माध्यमातुन देशात अशांतता निर्माण करण्याचे काम राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्ष काही करीत आहे. हे योग्य नसून आंदोलन शांततेच्या मार्गाने केले पाहिजे, असे ते म्हणाले.
मुंबईमध्ये आज होत असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनात शरद पवार सहभागी होत आहेत. त्यांनीदेखील अशाच कायद्याचे विचार अनेकवेळा मांडले असून आता तेच त्यांच्या मूळ विचारला विरोध करत आहेत. जे काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात होते. तेच आम्ही मांडत असल्याचे ते म्हणाले.