पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मागिल दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव, कोरोनाची प्रचंड भीती, उन्हाची काहिली अशा तिहेरी कात्रित हडपसर वासियांचा जीव गुदमरला आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्युतप्रवाह खंडित होत आहे. महावितरणकडे स्थानिक नागरिकांनी वारंवार भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचे आणि कार्यालयाचे भ्रमणध्वनी व्यस्त असल्याची तक्रार नागरिकांनी केली.
हडपसरमधील भेकराईनगर, गंगानगर, लक्ष्मी कॉलनी, सातववाडी, गोंधळेनगर या परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. कोरोनाचे सावट वाढत असून, अद्याप आयटी कंपन्यांबरोबर इतरही कंपन्यांचे कर्मचारी-अधिकारी वर्क फ्रॉम होम काम करीत आहेत. त्यांनाही विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्युतपुरवठा खंडित झाला की, नेटलाही मोठी अडचण येत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे वर्क फ्रॉम होमसह सर्वच नागरिकांनी सूचित केले आहे.
मागिल आठवड्यापासून उन्हाचा कडाका वाढत असून, विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. त्यातच अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, काही ठिकाणी तर विद्युत पंपाशिवाय पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना फक्त कोरोना नाही, तर उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे घरात थांबणेही असह्य झाले आहे. वीजबिल भरले नाही, तर वीजजोड बंद करण्यासाठी महावितरण तत्पर धावत येते, त्याचप्रमाणे विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत ठेवण्यासाठी तत्परत दाखविणे गरजेचे आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून साखळी पद्धतीने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ज्या ज्या विभागामध्ये पाणीपुरवठ्याची वेळ आहे, त्यावेळी विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान, पुण्यातील आयबीएम उपकेंद्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विद्युतपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, त्यामध्ये काही अडचणी आल्याने नागरिकांची गैरसोय झाली, असे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पंडित दांडगे यांनी सांगितले.