पुणे : बहुजननामा ऑनलाईन – येरवड्यातल्या कुविख्यात गुन्हेगार आकाश भातकर याच्यासह टोळीतील 5 जणांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी आदेश दिले आहेत.
आकाश सोमनाथ भातकर (वय 28), शेखर परशुराम कुऱ्हाडे (वय 23), प्रथमेश राजेंद्र सूर्यवंशी (वय 21), किरण भगवान मिरे (वय 20, रा. येरवडा परिसर) अशी तडीपार करण्यात आलेल्याची नावे आहेत.
आकाश भातकर हा टोळी प्रमुख आहे. त्याने टोळी तयारकरून परिसरात चांगलीच दहशत माजवली होती. त्यामुळे विनाकारण सर्व सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होत होता. दरम्यान त्यांच्यावर खूनासह इतर गंभीर 10 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होत असल्याने वरिष्ठ निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव उपायुक्त देशमुख यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार देशमुख यांनी या टोळीला 2 वर्षांसाठी शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालयातून तडीपार केले आहे. एकाला मोहोळ, तळोजा नवी मुंबई आणि उमरगा उस्मानाबाद जिल्ह्यात सोडण्यात आले आहे.