पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लोहगाव परिसरात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने भर गर्दीच्या वेळी तुफान राडा घालत रिक्षाची तोडफोड केली तर दोन तरुणांवर कोयत्याने सपासप वार करत त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. सायंकाळी प्रकार घडल्याने जमलेल्या व्यक्तींनाही धमकावत दहशत निर्माण केली आहे. अद्याप कोणाला पकडण्यात आलेले नाही.
याप्रकरणी सुनील पवार (वय 24, रा. धानोरा) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आठ ते दहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. स्वामी समर्थ नगर येथील पूजा मार्केट येथे मित्रांसोबत बोलत थांबले होते. यावेळी दुचाकीवर हातात कोयते आणि बांबू घेऊन आठ ते दहा जणांचे टोळके येथे आले. त्यांनी फिर्यादी यांना करण राखपसरे किधर है, आज उसे नही छोडेंगे, उसको खतम करेंगे असे म्हणत पकडो इनको. सब करणं के दोस्त है असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तर एकाने फिर्यादी यांचे रिक्षाच्या काचेवर कोयता मारून तो फोडला.
तसेच परिसरात जमलेल्या आजूबाजूच्या लोकांना शिवीगाळ करत तुम्ही आमच्या भांडणात पडला तर तुम्हालाही मारू असे म्हणत फिर्यादीवर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांचा मित्र शंभू कांबळे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा सर्व प्रकार सायंकाळी घडला असून, यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. अद्याप या टोळक्याबाबत माहीती मिळालेली नाही. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन जाधव हे करत आहेत.