पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यातील कोरोना (Pune Corona) परिस्थितीचा आढावा पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) घेतला. त्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. आषाढी वारीबाबत (Ashadhi Wari) पुण्यातील बैठकीत चर्चा झाली. देहु (Dehu) आणि आळंदी (Aalandi) पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच 10 मानाच्या पालख्यांसाठी 50 जणांना सहभागी होता येणार आहे. त्यांना मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला आहे. पालखीसोबत त्यांना चालत जाता येणार नाही. प्रत्येक पालखीला 2 बसेस असे 10 पालख्यांना 20 बसेस दिल्या जातील, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.
अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, मानाच्या पालखी सोहळ्याचं आगमन हे दशमीला पंढरपूरात होईल. वाखरीत विशेष वाहनाने पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरपर्यंत पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंदीर दर्शन खुले करण्यात येणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अद्यापही पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. दुसरीकडे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची आषाढी वारीही (Ashadhi Wari) प्रतिकात्मक (Symbolic) स्वरुपात साजरी करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (District Collector Milind Shambharkar) यांनी मदत व पुनर्वसन विभागाला पाठवल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. यावर पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल.