शिक्रापुर : बहुजननामा ऑनलाईन – शिरुर तालुक्याच्या शिरसगाव काटा येथे अचानक लागलेल्या आगीत शेतमजुरांच्या चार झोपड्या जळून खाक झाल्या असून यात शेतमजुरांचे संसार उघड्यावर आले आहेत.
याबाबत कामगार तलाठी योगेश टिळेकर यांनी माहिती नुसार, शिरसगाव काटा येथील मानेमळा येथे भिल्ल समाजाच्या काही घरे असून ती रोजंदारी व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. दिनांक.2 एप्रिल रोजी दुपारी अचानक आग लागून यातील चार कुटुंबाच्या छप्पराच्या घरास आग लागून घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य, भांडी,कपडे जळून खाक झाली.या लागलेल्या आगीत मोहन बरडे,रामदास जाधव,चंदा शिंदे, सुलभा माळी या शेतमजूर कुटुंबाच्या झोपड्या जळून खाक झाल्या असून सर्वांचे मिळून एक लाख ८५हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती टिळेकर यांनी दिली आहे.
दरम्यान घटनेची माहिती कळताच गावचे सामजिक कार्यकर्ते नरेंद्र माने,सतीश चव्हाण, सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी भेट देत कुटुंबाची चौकशी केली आहे.तर शिरूर येथील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली चव्हाण यांनी या कुटुंबांना तातडीने मदत व्हावी यासाठी पुढाकार घेतला असून समाजातील दानशूर व्यक्तींनी या कुटुंबांना सावरण्यासाठी मदत देत पुढे यावे असे आवाहन वैशाली चव्हाण यांनी केले आहे.