पुणे : बहुजननामा ऑनलाइन – आतापर्यंत चीनमधील कोरोना व्हायरसने हजारो लोकांचा मृत्यू झाला असून इतरही देशात हा व्हायरस पसरला आहे. या व्हायरसचा उपाय अजूनपर्यंत मिळाला नसून पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या व्हायरसला उपाय शोधण्यात यश मिळाले आहे. त्यांनी एक लस तयार केली असून अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीने ही लस तयार करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावर वैद्यकीय चाचणीसाठी ही लस उपलब्ध असून सहा महिन्यांनतर तिची चाचणी केली जाणार आहे.
‘ही विकसित होणारी लस प्रचंड रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. तसेच ही लस सहा महिन्यांत मानवी चाचणीसाठी तयार होईल. ही भारताची पहिली लस असेल, जी इतक्या वेगानं या स्तरापर्यंत आणण्यात यश प्राप्त झालं आहे,’ असे एसआयआयचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले.
मानवी चाचणी झाल्यानंतर या लसीला केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाकडून मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर कोरोनाला रोखण्यासाठी तिचा उपयोग करण्यात येईल. मानवी शरीरावर लसीचे संशोधन करण्यासाठी एक वर्ष लागणार असून २०२२ च्या सुरुवातीला या लसीची निर्मिती होऊ शकते. ही लस विकसित झाल्यावर जागतिक स्तरावर फैलावलेल्या साथीच्या रोगाचा सामना करण्यात भारत किती सक्षम आहे हेच यातून दिसते, असेही पूनावाला यांनी सांगितले.