बहुजननामा ऑनलाईन- जम्मू-काश्मीरमध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गाड्यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला म्हणजे गुप्तहेर यंत्रणांचे अपयश, असा निष्कर्ष सीआरपीएफच्या अंतर्गत आहवालात असल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. मात्र हा अहवाल गृह मंत्रालयाच्या विधानाच्या विरोधात असल्याचे सांगण्यात येत आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार पुलवामा दहशतवादी हल्ला हा गुप्तचर यंत्रणाचे अपयश नव्हता.
या तपासणी अहवालात असे सांगितले गेले आहे की, आयईडी ही धोक्याच्या संदर्भातील एक सामान्य सुचना होती. पण कारद्वारे आत्मघातकी हल्ल्याचा कोणताही धोका नव्हता. तसेच कश्मीर खोऱ्यातील कोणत्याही गुप्तचर यंत्रणेकडून अशी कोणतीही माहिती मिळाली नव्हती. मात्र सीआरपीएफने एका निवेदनातून या सर्व चर्चांना फेटाळून लावत आरपीएफच्या अहवालात असा कोणताही निष्कर्ष आला नसल्याचे सांगितले आहे. माध्यामांमध्येच पुलवामा घटनेशी संबंधित सीआरपीएफच्या अंतर्गत अहवालांवर कोणत्याही पुराव्याशिवाय चर्चा सुरु आहेत. माध्यमांनी दिलेल्या या अहवालाच्या आधारे जे काही निष्कर्षात आले आहे ते सीआरपीएफच्या अहवालामध्ये नाही.
तर गृहमंत्री यांनी जाहीर केलेल्या गृहमंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या तीन दशकांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून पाठिंबा असलेल्या दहशतवादाला खतपाणी घालण्यात येत आहे. दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता आणि सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरूद्ध सतत कारवाई करण्याच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात दहशतवादाला निष्प्रभावी करण्यात यश आले आहे. प्रत्येक यंत्रणा समन्वय साधून काम करत असल्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्यात एनआयएने आतापर्यंत केलेल्या तपासात आरोपीची ओळख पटविण्यात आली आहे.
या तपासात सीआरपीएफच्या अंतर्गत अहवालात हा हल्ला होण्यामागे गाड्याच्या ताफ्याच्या अंतरासह अनेक त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत. चौदा फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यात ७८ वाहने होती आणि २५४७ जवान जम्मू श्रीनगरला रवाना झाले होते. त्यामुळे ताफ्याला दूरवरून ओळखणे सोपे झाले आणि ही माहितीही लगेच लीक झाली होती. लष्कराच्या वाहतुकीदरम्यान इतर नागरिकांच्या वाहतुकीला परवानगी देणेही सीआरपीएफला महागात पडले. तपासणीदरम्यान हेही आढळून आले की, लष्कराच्या लांबच लांब वाहनांचा ताफाही या हल्ल्याला जबाबदार होता. त्यात हिमवृष्टीमुळे ४ फेब्रुवारीनंतर लष्कराव्यतिरीक्त इतर कोणत्याही वाहनासाठी जम्मू कश्मीर महामार्ग बंद ठेवण्यात आला होता.
दुपारी साडेतीनच्या सुमारास सीआरपीएफ बसच्या ताफ्यातील ७६ क्रमांकाच्या एचआर ४९ एफ ०६३७ वर आत्मघातकी हल्ला झाला. ताफ्यात ही बस ५व्या क्रमांकावर होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यानंतर मानक प्रमाणित कार्यपद्धतीप्रमाणे (एसओपी) हल्ल्याचा पाठपुरावा करण्यात आला. नियमानुसार प्रत्येक ४ गाड्यांमध्ये अंतर असावे लागते. हे अंतर ठेवण्यात आल्यामुळे हल्ल्याचा परिणाम फक्त एकाच वाहनावर झाला. सीआरपीएफच्या बंकर वाहनातून एक व्हिडिओ सापडल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे, त्यात आरईपी ड्यूटीवर असताना एएसई राम लाल यांनी आत्मघाती हल्लेखोरांचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले होते.
सूत्रांनी सांगितले की, १५ पानांचा अहवाल सीआरपीएफ डीजींकडे मे महिन्यात देण्यात आला होता, ज्यामध्ये हल्ल्याबाबत टिप्पण्या नमूद केलेल्या होत्या. मात्र हा अहवाल त्यांच्यापर्यंत पोहोचला नसल्याचे डीजी आर. आर भटनागर यांनी सांगितले. कश्मीर खोऱ्यातील सद्यस्थितीमुळे तेथील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याने अंतिम अहवालात आणखी विलंब झाला आहे.