नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – देशात लोकशाही टिकवायची असेल तर संविधानाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान मानणाऱ्यांना बळ द्या, असे आवाहन बीएसआयचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा प्रणीत समता सैनिक दलाच्या ९२ व्या दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा शुभारंभ झाला. दीक्षाभूमी येथील बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित या अधिवेशनात दलाच्या भविष्यावर चर्चा करतानाच संविधानावर होणाऱ्या आक्रमणावर चिंता व्यक्त करण्यात आली.
उद्घाटन सत्राला दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष, भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, समता सैनिक दलाचे जॉइंट कमांडर इन चीफ जगदीश गवई उपस्थित होते. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस व स्टाफ ऑफिसर एस. के.भंडारे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘समता सैनिक दल : कल, आज और कल’ यावर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे, ‘सैनिकांची जबाबदारी व कर्तव्य’ यावर राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड, ‘सामाजिक सुरक्षेचे संवैधानिक अधिकार व कायदे’ यावर राष्ट्रीय सचिव ॲड. एस. एस. वानखेडे, ‘दलाची घटना व प्रस्ताव’ यावर या सत्राचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. समता सैनिक दलाच्या नागपूर जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष दशरथ शंभरकर, नागपूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष सी. आर. सोनडवले या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत. अधिवेशनात देशभरातील समता सैनिक दलाचे जवान सहभागी झाले होते.