नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खुलासा केला आहे की, 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला रोखण्यासाठी एकत्र येऊन सरकार बनविण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्यास काँग्रेसने ताबडतोब नकार दिला होता.
चव्हाण यांनी म्हटले की, शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ आणि अध्यक्ष सोनिया गांधी सुरूवातीस तयार नव्हते, परंतु मोठ्या विचार विनिमयानंतर पुढे जाण्याचा आणि सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील नोव्हेंबरच्या अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसेना-कांग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे.
यापूर्वीही मिळाले होते निमंत्रण
मोठ्या कालावधीसाठी वैचारिक विरोधक असलेल्या शिवसेनेसोबत हातमिळवणी कशी केली याबाबत विचारले असता, चव्हाण म्हणाले, हिच स्थिती पाच वर्षांपूर्वीही आली होती. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे अल्पमतातील सरकार स्थापन झाले होते आणि शिवसेना विरोधी बाकावर होती. त्यावेळीही शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून हा प्रस्ताव माझ्याकडे आला होता. आपण तिघे मिळून सरकार स्थापन करू आणि भाजपाला रोखू असे सांगितले गेले होते. त्यावेळी मी म्हटले होते की, जय-पराजय होत असतो आणि आपण पराभूत झालो आहोत. यापूर्वीही असे झाले आहे.