नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात काही फेरबदल होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यातही या चेहऱ्यांमध्ये भाजपच्या मित्र पक्षाच्या कोट्यातून काही नेत्यांना संधी देण्यात येणार असल्याचे म्हंटले जात आहे. मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी मंत्र्यांच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा देखील घेणार असल्याचे समजते. हा आढावा घेतल्यानंतरच मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत.
दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन १८ सप्टेंबर ते १३ डिसेंबर या काळात होणार आहे. याआधीच हे फेरबदल होण्याची शक्यता आहे. याआधी मोदींनी ३० मे रोजी म्हणजेच आपल्या दुसऱ्या काळात पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपमधील नेत्यांना अधिक संधी दिली होती. यात शिवसेनेला केवळ प्रतिकात्मक प्रतिनिधित्व मिळाले तर जेडीयू सारख्या पक्षातील नेत्याला संधी दिलेली नव्हती. २१ तारखेला झालेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (२४) जाहीर होणार आहे.
या राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधी मोदी सरकारने प्रशासनात मोठे बदल केले असून मंगळवारी ११ सचिव आणि १२ ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. त्याच बरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या नव्या आयुक्तांची देखील निवड करण्यात आली. जम्मू-काश्मीर कॅडरचे आयएएस अधिकारी ब्रज राज शर्मा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्यासह संजीव नंदन सहाय यांची पॉवर सेक्रेटरीपदी नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासनात आणखी काही बदल होण्याची शक्यता असून यासंदर्भात लवकरच घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.
Visit : bahujannama.com