नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात प्रमुख राजकीय पक्षांपैकी कोणताही पक्ष अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करू शकलेला नाही. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शिफारस केली होती. त्यांच्या या शिफारसीला मंजुरी देण्यात आली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीनही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करण्यात अपयशी ठरल्याने महाराष्ट्रात ही परिस्थिती ओढवली आहे. राज्यपालांच्या शिफारसीनंतर आता या क्षणापासून राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्यात आली आहे.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा 24 ऑक्टोबर रोजी निकाल लागला. यानंतर राज्यात अद्यापही सरकार स्थापन झाले नव्हते. राज्यपालांनी प्रथम भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. भाजपने 105 जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता. 3 दिवसांचा कालावधी मिळूनही भाजप सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नाही. कारण मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत काडीमोड झाल्यानं भाजपला बहुमत सिद्ध करता आलं नाही. भाजपनंतर राज्यपालांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. शिवसेनेनं निवडणुकीत 56 जागा मिळवल्या होत्या. 24 तासांचा वेळ मिळूनही शिवसेना बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नाही. यानंतर राज्यपालांनी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं. राष्ट्रवादीलाही यासाठी 24 तासांचा वेळ देण्यात आला. बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये 24 तासामध्ये वाटाघाटी झाल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस देखील सत्ता स्थापनेचा दावा करू शकलं नाही.
President's Rule imposed in the state of #Maharashtra, after the approval of President Ram Nath Kovind. pic.twitter.com/tR3qW4xYbR
— ANI (@ANI) November 12, 2019
कोणताही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करण्यात यशस्वी होत नाही हे पाहून राज्यापालांनी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस केली. यानंतर या प्रकरणी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. बैठकीनंतर त्यांनीही राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शिफारस केली. यानंतर अखेर आज (मंगळवारी) रात्री राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या क्षणापासुन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
यापुर्वी 2 वेळा महाराष्ट्रात लागू झाली होती राष्ट्रपती राजवट
इतिहासात महाराष्ट्रात 2 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. सन 1980 आणि सन 2014 मध्ये राज्य राष्ट्रपती राजवटीखाली गेलं होतं. शरद पवार यांच्या अधिपत्याखाली सन 1978 मध्ये पुलोदचं सरकार होतं. ते सरकार बरखास्त करून त्यावेळी विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे दि. 17 फेब्रुवारी ते दि. 9 जून 1980 दरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सन 2014 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. सन 2014 मध्ये 32 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचा पाठिंबा राष्ट्रवादीनं काढल्याने सरकार कोसळलं होतं आणि त्यानंतर दि. 28 सप्टेंबर 2014 ते दि. 31 ऑक्टोबर 2014 दरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
राष्ट्रपती राजवट काय असते –
भारतीय राज्यघटनेत 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत –
1. राष्ट्रपती आणीबाणी
2. आर्थिक आणीबाणी
3. राष्ट्रपती राजवट
कलम 356 नुसार राज्यातील प्रशासन सुव्यवस्थेत नसल्यास राष्ट्रपती राजवटीची तरतूद आहे. ज्या राज्यातील सरकार केंद्राच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत आहेत तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घेतला जातो, राज्यपाल राष्ट्रपतींकडे राज्यातील परिस्थितीचा अहवाल देतात त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवटीची घोषणा करण्यात येते.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्याला संसदेची मान्यता आवश्यक असते. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर 6 महिने राष्ट्रपती राजवट लागू करता येते. परंतू संसदेने पुन्हा एकदा 6 महिन्यापर्यंत मान्यता दिल्यास हा कालावधी वाढू शकतो. राष्ट्रपती राजवट पुढील 3 वर्षांपर्यंत कायम करता येते.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास काय होईल –
एकदा का राष्ट्रपती राजवट लागू झाली तर राज्याचा सर्व कारभार राष्ट्रपतीच्या हाती जातो. त्यांच्यामार्फत राज्यपाल राज्याचा कारभार पाहतात. राज्याच्या मुख्य सचिवांना हाताशी घेऊन राज्यपाल राज्याचा कारभार पाहत असतात.राज्यविधीमंडळाची कामे देखील संसदेकडे सोपवण्यात येतात. राष्ट्रपती कोणत्याही अधिकाऱ्यांकडून कामे करु घेऊ शकतात. त्यानंतर राज्याच्या निधीतून पैसे खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपतीकडून देण्यात येतात. यासाठी राष्ट्रपती प्रासंगिक व्यवस्था करुन घोषणांची पुर्तता करतात.
आगामी 3-4 दिवसात काय
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र येवुन चर्चा करण्यास सुरवात करतील. त्यांच्यात सत्तास्थापनेबाबत एकमत झाल्यास आणि सत्तेच्या वाटाघाडी झाल्यास शिवसेना राज्यपालांना भेटुन सत्तास्थापनेचा दावा करू शकते.
Visit : bahujannama.com