सूरत : बहुजननामा ऑनलाइन – देशाच्या विभाजनाच्या पापाचे प्रायश्चित म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा आहे. विभाजनाचे पाप काँग्रेसने केले होते मात्र त्याचे प्रायश्चित आम्ही करत आहोत. यासाठी काँग्रेसने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे स्वागत केले पाहीजे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते प्रताप सारंगी यांनी केले आहे. गुजरातमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सारंग यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला.
प्रताप सारंगी म्हणाले, देशाच्या विभाजनाचे पाप तर काँग्रेसने केले होते मात्र त्याचे प्रायश्चित आम्ही करत आहोत. यासाठी काँग्रेसने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे स्वागत केले पाहीजे. या कायद्याला विरोध का केला जात आहे? कारण त्यांचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. त्यामुळेच ते देशामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक अशापद्धतीचे काम करतात त्यांना देशप्रेमी मानले जात नाही. ज्यांना भारताचे स्वातंत्र्य, अखंडता आणि वंदे मातरम मान्य नाही त्यांना या देशामध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे सारंगी यांनी म्हटले.
#WATCH Union Minister Pratap Sarangi in Surat, Gujarat: Those who do not accept Vande Mataram have no right to live in India. (18.01.2020) pic.twitter.com/zEr4R8Z7Op
— ANI (@ANI) January 18, 2020
केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी काही दिवसांपूर्वी वंदेमातरमबाबत वादग्रस्त मत मांडले होते. जे लोक वंदे मातरमचा स्वीकार करू शकत नाहीत, त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी म्हटले होते. तर कलम 370 हटवण्यावरूनही त्यांनी यापूर्वी काँग्रेसवर निशाणा साधला होता. कलम 370 हटवण्याचा निर्णय काँग्रेसने 72 वर्षांपूर्वीच घेतला पाहिजे होता. मोदी सरकारने 72 वर्षांनंतर काश्मीरमधील नागरिकांना सर्व अधिकार दिले आहेत. आता जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती पूर्णपणे शांत आहे, असा दावा सारंगी यांनी केला होता.