नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. भाजपने बंगालमधील ममता बॅनर्जींच्या हातून सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी अनेक महिन्यापासून पूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी बंगालमध्ये मोठ्या रॅली काढल्या. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनी बंगालमध्ये तळ ठोकला होता. भाजप नेत्यांकडून बंगालची निवडणुक जिंकण्याचा दावा केला जात होता. शिवाय 200 जागां मिळतील असाही दावा केला होता. तर भाजपला 100 चा आकडा देखील गाठता येणार नाही, असा अंदाज निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी वर्तवला होता. प्रशांत किशोर यांनी वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.
प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मागील लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भाजपने जोरदार धक्का दिला. त्यावेळी मला ममता बॅनर्जी यांचा फोन आला आणि तातडीने येण्यास सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आपली रणनिती बदलली होती. मात्र याचा अंदाज भाजपला आला नाही. तृणमूलने थेट लोकांच्या संपर्कात येणाऱ्या कार्यक्रमांवर भर दिला. लोकांमध्ये राहून अधिकाधिक काम करण्यास सुरुवात केली, असे प्रशांत किशोर यांनी मुलाखतीत सांगितले.
अमित शहा यांनी बंगालमध्ये जातीने लक्ष घातले होते. मात्र तरी देखील भाजपला शंभरचा आकडा गाठता आला नाही. गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधताना प्रशांत किशोर म्हणाले, कदाचीत मी जे काही बोलणार आहे ते अहंकारी वाटेल. पण मला अमित शहा ओव्हर रेटेड राजकीय आणि निवडणूक मॅनेजर वाटतात, अशी टीका त्यांनी केली. अमित शहा यांनी आजपर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये कोणते व्यवस्थापन कौशल्य दाखवलं ? असा प्रश्न प्रशांत किशोर यांनी उपस्थित केला.
प्रशांत किशोर पुढे म्हणाले, अमित शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याकडे अनेक संसाधने आहेत. संघ आणि पक्षाचे मोठे नेटवर्क त्यांच्यामागे आहे. शिवाय सरकार आणि सरकारी यंत्रणा त्यांच्या मागे भक्कमपणे उभ्या आहेत. निवडणूक आयोगाने घेतलेले अनेक निर्णय त्यांच्या पथ्यावर पडले तरीही ते हरले. यावरुन तुम्हाला अमित शहांच्या नावलौकिकाची, प्रतिष्ठेची कल्पना येईल, असा टोला त्यांनी लगावला.
प्रशांत किशोर म्हणाले, आम्हाला विश्वास होता की ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकू. यावेळी त्यांनी अमित शहा आणि भाजपची काय चूक झाली हे सांगितले. ते म्हणाले, प्रोपॅगेंडा तुम्हाला निवडणूक जिंकून देत नाही. भाजपमध्ये खासकरून अमित शाहा यांच्यामध्ये मग्रुरी दिसत होती. ते आकाशात उडत होते. त्यामुळे ते जमिनीपासून खूप दूर गेले. या निवडणुकीत आम्हीच विजयी होणार, असे त्यांनी जाहीर करुन निवडणूक लढवण्यास सुरुवात केली. मात्र, त्यावेळी त्यांनी केवळ पोकळ बाता केल्या होत्या, अशा शब्दात प्रशांत किशोर यांनी भाजप आणि अमित शहा यांचा समाचार घेतला.