बहुजननामा ऑनलाईन : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लीम मते त्या धर्मातील राजकीय नेत्यांच्या हातात नाहीत, तर ती मौलवींच्याच हातात आहेत असा दावा करत औरंगाबाद येथे मौलवी आणि उलेमांची बैठक घेतली. वंचित बहुजन आघाडीचा मुस्लीम ‘अजेंडा’ ठरविण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले की, मुस्लीम मते केवळ मौलवींच्याच हातात असल्याचा आंबेडकरांचा दावा अमान्य असल्याचे त्यांनी सांगितले. .लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूरमध्ये काँग्रेसधार्जिण्या मौलवींनी मुस्लीम मते काँग्रेसकडे वळवली. त्या वेळी ‘एमआयएम‘चे नेते असुरुद्दीन ओवेसी, अकबरोद्दीन ओवेसी यांना पुरेसा वेळ देता आला नव्हता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला पुरेशी मुस्लीम मते मिळाली नाहीत.
गुरुवारी जलील यांनी स्पष्ट केले की, मुस्लीम मतांसाठी मौलवींशी चर्चा करण्याचा मार्ग आंबेडकर यांनी निवडला असला, तरी त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि ‘एमआयएम’मधील युतीत कोणताही बदल होणार नाही. लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मते मिळविणाऱ्या वंचितला मुस्लीम मते मिळाली नाहीत या निष्कर्षावर भाष्य करत आंबेडकर म्हणाले की, ही मते आता मौलवींच्या हातात आहेत, असे दिसते. त्यांनी ती काँग्रेसकडे वळविली. मात्र, असे असले तरी ‘एमआयएम’शी आघाडी करण्याच्या निर्णयात काही चूक नव्हती. त्या नंतर आंबेडकरांनी स्पष्ट केले की, यापुढेही त्यांच्याबरोबर राजकीय आघाडी कायम ठेवली जाईल.
‘एमआयएम’ने १०० जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला दिला होता. एवढय़ा जागा त्यांना दिल्या जातील का, असे विचारले असता आंबेडकर म्हणाले, की ते कितीही जागा मागतील, पण त्याबाबतची स्वतंत्र समिती आहे, ती तपासून सांगेल. गुरुवारीच ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि या समितीतील सदस्यांची बैठकही घेण्यात आली. इम्तियाज जलील यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, या बैठकीत १०० ऐवजी ८० जागांचा प्रस्ताव नव्याने देण्यात आला आहे. त्यातही तडजोड केली जाऊ शकते.