लातूर : बहुजननामा ऑनलाईन – लातूर राखीव लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची घोषणा आज (सोमवार) करण्यात आली. माजी शिक्षणाधिकारी राम गारकर यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज आयोजित केलेल्या सत्ता संपादन सभेत अॅड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्राध्यापक सुभाष भिंगे, माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भद्रे, महाराष्ट्र विकास आघीडेचे आण्णाराव पाटील, एमआयएमचे जिल्हाअध्यक्ष सय्यद ताहेर हुसेन, शिवानंद हैबतपूरे, संयोजक संतोष सुर्य़वंशी उपस्थित होते.
लातूर लोकसभा मतदार संघ हा राखीव मतदार संघ आहे. मतदारसंघासाठी माजी शिक्षणाधिकारी राम गारकर हे आघाडीचे उमेदवार असतील. त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून त्यांना विजयी करावे असे आवाहन देखील आंबेडकर यांनी केले.
सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला विचारले नाही. त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन जाहिर सभा सुरु केल्या आहेत. वंचितांचा उत्साह, वंचितांचे बंड पाहून आता हे विचारायला येत नाही. त्यांना वंचितांबरोबर आघाडी करायची नाही तर त्यांचे बंड मोडून काढायचे आहे. हे बंड मोडले तर पुन्हा उभा रहायला वेळ लागेल असे त्यांना वाटत आहे. आमचे बंड बदल घडवल्याशिवाय थांबणार नाही. राज्यातील ४८ मतदारसंघात आघाडीचे उमेदवार उभे केले जाणार आहेत. या उमेदवारात एकही प्रस्तापित उमेदवार नसेल. सर्व उमेदवार हे सर्व समान्य असतील असेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडवून आणल्या जावू शकतात अशी भिती व्यक्त करीत त्यांनी २१ फेब्रुवारीपर्यंत आघाडीच्या वतीने सर्वत्र शांती मोर्चा कढण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. आमची सत्ता आल्यास शिक्षणासाठी दहा टक्के खर्च केला जाईल. सरकाने जाहिर केलेला अर्थसंकल्पातील आकडेवारी ही खोटी आहे. या गैरविश्वासू सरकाला खाली खेचण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागेवे असे आवाहनही अॅड. आंबेडकर यांनी यावेळी केले.