मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मागच्या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता. या संकटावरून महाराष्ट्रातील विविध यंत्रणा सज्ज होत्या. यावरून नागरिकांना लवकरात लवकर मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करा, असा आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासन यंत्रणेला दिले होते. यावरून आता शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत, याचीही पंतप्रधान मोदींना खात्री पटली असावी, असे राऊत यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाशी सामना करु शकतात, ही गोष्ट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पटली असेल, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी राऊत हे आज माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दौऱ्याविषयी माध्यमांनी विचारणा केली असता यावरून राऊत म्हणाले, तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. परंतु, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत.
या दरम्यान, राज्यात तौत्के चक्रीवादळाने कहर केला आहे. या संकटामुळे राज्यात १८ जणांचा मृत्यू झाला. तर २८ जण या वादळाच्या तडाख्यात जखमी झाले आहेत. मुंबईत वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्रातील विविध ११ हजार ठिकाणी नुकसान झालं आहे. तर १० हजार हेक्टर शेती क्षेत्र वादळामुळे बाधित झालं आहे. तसेच या संकटाच्या पार्श्वभूमीवरआत्तापर्यंत १३ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.