नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) अंतर्गत आता देशातील 7.63 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. यातील 3.65 कोटी लोकांना तिसरा हप्ता देखील मिळाला आहे. परंतु बाकी शेतकरी अद्याप आपल्या लाभासाठी वाट पहात आहेत. ज्या शेतकऱ्यांना आपल्या या हप्त्याचे स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर आता सोपे झाले आहे. केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी यांनी सांगितले की, पीएम किसान पोर्टलवर जाऊन कोणताही शेतकरी आपला आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा बँक खात्याचा नंबर टाकून आपल्याला मिळणाऱ्या पैशांचं स्टेटस जाणून घेऊ शकतो.
चौधरी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आता या योजनेचा फायदा घेण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे जाण्याची आवश्यकता नाही. कोणताही शेतकरी स्वत: या पोर्टलवर जाऊन स्वत:च आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो. कृषी मंत्रालयाची ही सुविधा सुरू केल्यानंतर राज्य सरकारला आता शेतकऱ्यांच्या तपशीलात झालेल्या चुका दुरुस्त करण्यात आणि त्याची पडताळणी करण्यात पहिल्यापेक्षा खूपच कमी कालावधी लागणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यात सध्या उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. येथील तब्बल पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यातील 1.24 कोटी शेतकऱ्यांना तर तिसरा हप्ताही मिळाला आहे. ही योजना 24 फेब्रुावारी 2019 रोजी सुरु करण्यात आली होती यानंतर केवळ 12 कोटी शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली होती. परंतु पुन्हा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच 14.5 कोटी शेतकरी कुटुंबासाठी ही योजना लागू केली.
समाधान नसल्यास येथे करा तक्रार
लेखापाल व कृषी अधिकारी खर्या शेतकर्याला लाभ देण्यात दुर्लक्ष करत असतील तर सोमवार ते शुक्रवार पर्यंत पीएम किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk)चा ई-मेल आयडी pmkisan-ict@gov.in वर शेतकरी तक्रार करू शकतात. तरीही समाधान न झाल्यास शेतकरी 011-23381092 (Direct HelpLine) या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकतात. ही केंद्रीय कृषी मंत्रालयाची हेल्पलाईन आहे. इथे संपर्क केल्यास शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल हमखास घेतली जाईल.