मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नावे समोर आले आहे. त्यानंतर याच मुद्द्यावरून विरोधकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षातील नेत्याला अभय देणार की लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी कारवाई करणार हे पाहणे गरजेचे आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड गेल्या 15 दिवसांपासून गायब होते. मात्र, त्यांनी पोहरादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्यादरम्यान त्यांनी समर्थकांची गर्दी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे भाजपने याच मुद्यावरून टीकास्त्र सोडले. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले, की आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णय क्षमतेची परीक्षा आहे. संशयाची सुई आपल्या एका मंत्र्यावर आहे. हे दूर होईपर्यंत मंत्र्याला पदावरून दूर करायचं की नाही, हेही आता मुख्यमंत्र्यांना ठरवायचं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे आपल्याच पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना अभय द्यायचे की राज्यात पक्षाबद्दल, लोकशाहीविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा, हा निर्णय त्यांना स्वत: घ्यायचा आहे. त्यातूनच ते महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत की नाही हेही दिसेल, असेही ते म्हणाले.
…त्यावेळी अजित पवारांनीही दिला होता राजीनामा
तत्कालीन मंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप झाले होते. त्यावेळी त्यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. चौकशी अहवालातून जे काही सत्य समोर येईल. त्यानंतर पुन्हा मंत्रिपद मिळू शकते. मंत्रिपदावरून जाणं म्हणजे कायमचे जाणं होत नाही, असेही ते म्हणाले.