नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीस पुरेशा गांभीर्याने कारवाई करत नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी 12 ऑडिओ क्लिप्स पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठवल्या आहेत. यामुळे या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
तो आवाज सर्वांना माहिती आहे
पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांकडून गांभीर्याने कारवाई होताना दिसत नाही. पोलिसांकडे ज्या ऑडिओ क्लिप आहेत आणि त्यातला आवाज कोणाचा आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र, पोलिसांनी तो आवाज कोणाचा आहे, ते सांगायला हवा. सत्य लोकांसमोर यायला हवं, पण पोलिसांवर दबाव असल्याने त्यांच्याकडून सत्य लपवलं जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
पूजा चव्हाण प्रकरणी सत्य बाहेर आलेच पाहिजे !#JusticeForPoojaChavan pic.twitter.com/GK2SG8Fedq
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 14, 2021
चौकशी होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा
पूजा चव्हाण या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास करायला पाहिजे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. राठोड यांच्यावर झालेले आरोप पाहता चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, पोलिस कारवाई करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यासाठी मैदान खुलं आहे. पोलिसांवरील दबाव दूर व्हायला हवा आणि सत्य समोर यायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांना गांभीर्य नाही
पूजा चव्हाण प्रकरणात राठोड यांचे नाव आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये सत्य काय ते समोर येईलच. मात्र, त्याच वेळी मागे झाला तसा कुणाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते योग्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कदाचित घटनेचं गांभीर्य लक्षात आलेलं नसावं. त्यांनी कदाचित या प्रकरणातल्या ऑडिओ क्लिप ऐकल्या नसाव्यात किंवा नीट माहिती घेतलेली नसावी. त्यांनी ऑडिओ क्लिप नीट ऐकल्या तर त्यांना कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते समजेल, असं फडणवीस म्हणाले.