मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर होणाऱ्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे प्रकरण शांत होते तोपर्यंत पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने ठाकरे सरकार अडचणीत सापडलं आहे. विरोधकांनी सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या प्रकरणासंदर्भात एक ट्विट करून सरकारवर निशाणा साधला आहे. राजयोतील जनता सुरक्षित नाही हे दिसत आहे. राज्यात महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंडाची मिरवणूक निघत आहे हे सर जनता पाहत आहे.पण थेट मंत्रीच ११ दिवस गायब. ते कोणालाच सापडत नाहीत यापेक्षा राज्याची वाईट अवस्था काय असू शकते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ना आता ना पता. जनतेला वाऱ्यावर सोडल हे दिसतय पण किमान सहकारी मंत्री त्याचा तरी शोध घ्या असा टोला केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मिळालेल्या काही माहितीच्या आधारे पुणे पोलिसांच्या पथकाने थेट यवतमाळ गाठले. फेब्रुवारीला पहाटे ४.३४ वाजता वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात दाखल झालेल्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्यात आला. शनिवारी दुपारी दोनपर्यंत तिच्यावर उपचार करून तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्जही केले. उपचारासाठी दाखल तरुणी नेमकी कुठली, हे स्पष्ट झाले नाही.
विशेष म्हणजे ज्या युनिट-२ मध्ये ती दाखल झाली, त्या युनिटच्या डॉक्टरांनाही याबाबत काहीच माहिती नाही. ती ज्या वेळी आली त्यावेळी तिला दाखल करून घेणारे डॉक्टर कोण असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. गर्भपात अर्धवट अवस्थेत झाल्यानंतर दाखल तरुणीला काही तासांतच रुग्णालयातून सुटी कशी देण्यात आली, हेही एक कोडे आहे. महत्त्वाचे म्हणजे दाखल झालेल्या त्या युवतीचा पत्ताही नांदेड जिल्ह्यातील नोंदविण्यात आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.