रांची : वृत्तसंस्था – झारखंडमध्ये नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा 29 डिसेंबरला झाला होता. आता 24 दिवस पूर्ण झाले, परंतु अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. नव्या सरकारमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांसह एकुण 12 मंत्री असतील, ज्यापैकी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रीय जनता दलाच्या एका आमदाराने शपथ घेतली आहे. सध्या मंत्रिमंडळात 8 जागा भरायच्या आहेत. ज्यांना मंत्रीपदाची शपथ दिली आहे, त्यांनाही खाती मिळालेली नाहीत. विरोधी पक्ष आता नव्या सरकारवर काँग्रेसच्या हातातील बाहुले असल्याचा आरोप करत आहे.
भाजपाचे प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी आरोप केला की, आघाडी सरकार निवडणूक होण्यापूर्वीपासून झारखंडच्या जनतेचे सरकार होण्याचा दावा करत होते, परंतु प्रत्यक्षात हे सरकार काँग्रेसच्या हातातील बाहुले झाले आहे. 24 दिवसांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री हेमंत सोरेन पाच वेळा दिल्लीला गेले आणि 11 दिवस त्यांनी तेथे घालवले आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत बसून ट्विट करूनच सरकार चालवत आहेत. शाहदेव यांचा दावा आहे की काँग्रेस खातेवाटपात हस्तक्षेप करत आहे, ज्यामुळे मुख्यमंत्र्यांना कधी सोनिया गांधींच्या दरबारात तर कधी लालू प्रसाद यांच्या जेल दरबारात हजेरी लावावी लागत आहे. हा केवळ ट्रेलर असून अजून पूर्ण फिल्म बाकी आहे, असे शाहदेव म्हणाले.
विरोधी पक्षांसह सरकारला समर्थन देणारा झारखंड विकास मोर्चासुद्धा मुख्यमंत्री सोरेन यांना आरसा दाखवत आहे. झाविमोचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांना आपले विचार असले पाहिजेत. कुणाला मंत्री बनवायचे आणि कोणाला कोणते खाते द्यायचे हा निर्णय स्वता मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना स्वत:वर नियंत्रण असले पाहिजे, परंतु सध्या रांची आणि दिल्लीला वार्या करण्यात आणि समजावण्यात वेळ निघून चालला आहे. पाच वर्षातील एक महिना व्यर्थ गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वतंत्रपद्धतीने काम करू शकत नाहीत, तर पुढे काय काम होणार ? भाजपापासून दूर झालेले आणि जमशेदपुर पूर्वीमधून रघुवर दास यांचा विधानसभेत पराभव करणारे सरयू राय यांनी अजूनही मंत्रिमंडळ गठित न होणे चूकीचे असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या राजेश ठाकुर यांनी म्हटले आहे की, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, चर्चेत जास्त वेळ वाया गेला, ज्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
आमदारांमध्ये सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने नाराजी वाढत आहे. झामुमोच्या एका आमदाराने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, सरकार पूर्णपणे गठीत न झाल्याने अनेक विकास कामे अर्धवट पडली आहेत. कागदावरील कार्यवाही सुद्धा आवश्यक आहे. मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकत नाही. आमदारांकडेही काम नाही. सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. काँग्रेसने गृहमंत्रालयासारखी अनेक महत्वाची खाती मागितली आहेत, ज्यामुळे अद्याप एकमत झालेले नाही. आता सोरेन यांचीही नाराजी वाढत आहे. ते सुद्धा काँग्रेसच्या या मागण्यांमुळे नाराज आहेत. झारखंडमध्ये पुन्हा एकदा आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे आणि मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने सरकारबाबत चूकीचा संदेश जात आहे.
Visit : bahujannama.com