मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या बैठका घेऊन निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढण्यास तयार राहा. तसेच सर्वांनी एकदिलाने काम करून काँग्रेसला विजयी करण्यासाठी कामाला लागा असा आदेशच त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे राज्यात आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढवणार का ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
पटोले म्हणाले की, राज्यात काँग्रेसला अनुकुल वातावरण असून पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी ग्राऊंडलेव्हलला काम करा. स्वबळावर लढण्यास तयार राहा. महापालिका निवडणुकीत वार्डनिहाय जबाबदारी दिली जाईल. त्यानुसार काम करून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणा अशा स्पष्ट सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी एकलो चलो रे भूमिका स्वीकारल्याच दिसून येत आहे. काँग्रेसमध्ये सर्व समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका राहिली आहे. चांगले काम केले तर आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला.