गडचिरोली : बहुजननामा ऑनलाईन – राजकीय नेतेमंडळीच त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी नक्षलवाद्यांना दारूगोळा व शस्त्रे पुरवतात. या नेतेमंडळींचे नक्षलवाद्यांसोबत लागेबांधे असतात, असा आरोप गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या एका जवानाच्या आईने केला आहे. नक्षली हल्ल्यात कधीच कोणत्या नेत्यांचे नुकसान झाल्याचे समोर येत नाही या उलट मात्र पोलिसांचे हत्यासत्र सुरूच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गडचिरोलीतील कुरखेडाजवळ नक्षलवाद्यांनी बुधवारी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात क्यूआरटी पथकाचे १५ जवान शहीद झाले. यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील जवानांचा समावेश आहे.
हल्ल्यातील शहीद दयानंद शहारे यांची आई शकुंतला शहारे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या अकाली मृत्यूने व्यथित झालेल्या शकुंतला शहारे म्हणाल्या, नक्षलवाद्यांनी कधी नेत्यांना काही केले असे ऐकिवात नाही. मात्र पोलिसांचे हत्यासत्र सुरूच आहे. सर्जिकल स्टाईक’ची खरी गरज सीमेवर नव्हे तर नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याकरिता जंगलात असल्याचे त्यांनी सांगितले .