सटाणा : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. स्मशानभूमीतही मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. कोणताही विषय निघाला की कोरोनाच्या नकारात्मक बातम्या आणि त्यामुळे वाढणारी चिंता. मात्र अशा नकारात्मक वातारणातही नाशिकच्या सटाणा येथील सहायक पोलीस निरीक्षकांच्या एका उपक्रमाने सकारात्मक बदल पाहायला मिळाले आहेत. नागरिकांनीही त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
नाशिकमधील सटाणा शहरात विविध चौकात कोरोनाने मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे फलक लावले होते. टीव्ही, रस्ते, सोशल मिडिया सर्वत्र कोरोनामुळे मृत्यूच्या बात्म्यामुळे नकारात्मक वातावरण पसरले होते. अशा परिस्थितीत एपीआय देवेंद्र शिंदे यांना एक उपक्रम सुचला. त्यांनी शहरातील श्रद्धांजलीचे फलक हटवून त्या जागेवर कोरोनावर मात केलेल्यांचे फलक लावले. कोरोनातून आम्ही बरे झालो आहोत. तुम्हीही बरे व्हाल काळजी करू नका, असा संदेश चौका चौकात फलकांद्वारे देण्यात आला. त्यातून अनेकांना सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे सांगितले जात आहे. तुमचा एक चांगला विचारही समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. नागरिकांनीही याला प्रतिसाद दिला असून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी स्वतःच्या अनुभवातून हा उपक्रम सुचल्याचे म्हटले आहे. शिंदे यांच्या आईलाही कोरोनाची बाधा झाली होती. पण केवळ नकारात्मकता कमी केल्याने त्यांनी अवघ्या 3 दिवसात कोरोनावर मात केली. त्यामुले सकारात्मक वातावरण गरजेचे असल्याचे शिंदे म्हणाले. त्यांनी आधी स्वतःच्या गावातही हा उपक्रम राबवला आणि प्रतिसाद मिळाल्याने सटाण्यात हा उपक्रम राबवल्याचे ते म्हणाले.