पुणे : बहुजननामा ऑनलाईन – देशातील सर्वाच्च नागरी पुरस्कार असलेले भारतरत्न हे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर हा भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी विनंती पुणे महानगरपालिकेने केली आहे. तर याबाबत महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत असा हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. समाजसुधारक ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न घोषित करण्याचा केंद्र सरकारला आग्रह करण्याचा ठराव काँग्रेसचे नेते उल्हास बागुल यांनी सर्वसाधारण सभेत मांडला आणि सर्व राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने एकमताने तो मंजूर करण्यात आला आहे.
तर महापालिकेत केलेला हा विनंती ठराव आता राज्य व केंद्र सरकारकडे पाठविला जाईल. सर्वसाधारण समितीत ठराव मांडणारे पुणे महानगरपालिकेतील काँग्रेसचे नेते उल्हास (आबा) बागुल यांनी म्हटले, समाजसुधारक ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव मंजूर करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली नागरी संस्था आहे. तसेच, सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात आले आहे. त्यांच्या नावावर शिष्यवृत्ती सुरू झाली आहे परंतु त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केलेला ठराव तो राज्य सरकारकडे पाठविले जाईल तेथून ते केंद्र सरकारला याची शिफारस करु शकतील.असे बागुल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असताना अस्पृश्यता आणि जातीयता निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. तर सावित्रीबाई फुले यांनी देशातील महिला शिक्षणाला चालना दिली. शिक्षणाच्या कार्यासाठी या दोघांनी आपले आयुष्य वाहून घेतले. तसेच शोषित जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी जोतिरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर त्यांनी भिडेवाडा येथे १८४८ मध्ये पुण्यातील पहिली मुलींची शाळादेखील सुरू केली.
दरम्यान, पुणे शहरातील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ महर्षि धोंडो केशव कर्वे आणि प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न प्राप्त झाला आहे. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याशी पुण्यातील नागरिकांचा भावनिक संबंध आहे. त्यांचे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित आहे. महानगरपालिकेने नागरी मुख्यालयाच्या आवारात ज्योतिराव फुले यांचे स्मारकही बांधले असून देशभरात विविध ठिकाणी या दोघांची स्मारकं बांधली गेली आहेत.