नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावत ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी हे तुमच्यासाठी ट्रेलर असतील, मात्र आमच्यासाठी ते जीवन आहेत’, असे म्हटले आहे. संसदेत अर्थसंकल्प अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर ते बोलत असताना त्यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकारच्या कामांचा आढावा घेतला.
मोदी भाषणासाठी जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. तर त्यानंतर काँग्रेस आणि इतर खासदारांनी महात्मा गांधी झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. त्यावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांनी हा फक्त ट्रेलर असल्याचे मोदींना म्हटले. त्याला प्रत्युत्तर करताना तुमच्यासाठी गांधीजी ट्रेलर असतील, आमच्यासाठी मात्र जीवन आहेत, असे मोदी म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांवर चिमटे काढले असून तुम्ही राजकारण करा, केलेही पाहिजे. पण देशातील शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका, असे मोदींनी म्हणाले आहेत.
तसेच आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना चालवल्या असून या योजनांचा देशातील शेतकऱ्यांना फायदा झाला असल्याचेही मोदी म्हणाले. तसेच का झाले नाही, कधी होणार, कसे होणार, असे सगळे प्रश्न विचारल्यामुळे मला जराही वाईट वाटत नाही. मला वाटते की केवळ मोदीच काय ते करू शकतो हे तुम्ही आता मानू लागला आहात, असेही मोदी म्हणाले. विरोधक मोदींना नेहमीच देशातील बेरोजगारीवरून प्रश्न करत असतात. त्यालाही मोदींनी यावेळी विरोधकांना उत्तर दिले. देशातील बेरोजगारी दूर करण्याचे काम देखील आम्हीच करणार आहोत. मात्र, एक काम आम्ही अजिबात करणार नसून ते होऊही देणार नाही. ते आहे तुमची बेरोजगारी दूर करण्याचे काम. तुमची बेरोजगारी आम्ही संपू देणार नाही, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला.