मुंबई : बहुजननामाऑनलाइन – राज्यासमोरील असलेल्या विविध प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) हे मंगळवारी सकाळी दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे असणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा राज्यासमोरील मोठी समस्या बनला आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, यावर या भेटीत प्रामुख्याने भर असणार आहे.
मोदी यांच्याबरोबर बोलताना महाराष्ट्राची बाजू मांडताना काय बोलायला हवे,
याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही सूचना केल्याचे समजते.
राज्यांच्या आरक्षण देण्याचा अधिकार अबाधित आहे, हे लक्षात आणून द्यावे.
तसेच फेरविचार याचिका करतो आहोत, हे सांगून सामाजिक अभिसरणासाठी मराठा समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्याचा मुद्दा केंद्राने समजून घ्यावा, अशा काही सूचना केल्या आहेत.
मराठा आरक्षण प्रकरणी केंद्राने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे़ या भेटीत ते ही अपेक्षा प्रत्यक्ष बोलून दाखवतील. मराठा आरक्षणाबरोबरच राज्याला होणारा कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा, जीएसटी थकबाकीची रक्कम राज्याला त्वरीत देणे या ठळक मुद्द्यांचा चर्चेत समावेश असणार आहे. या चर्चेच्या दरम्यान, राज्य शासनाच्या वतीने एक पत्रही देण्यात येणार आहे.
गेल्या दीड वर्षात केंद्र आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संबंध टोकाचे ताणले गेले आहेत. या भेटीनंतर या संबंधातील तणाव दूर होण्यास मदत होणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
हे देखील वाचा
तणाव आणि चिंतेमध्ये जगत असाल, तर दररोजच्या नित्यकर्मामध्ये ‘हे’ 3 व्यायाम सामील करा