नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत थैमान घातले. मात्र मागील काही दिवसांपासून देशातील रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, मृत्यूची संख्या कायम असल्याने चिंता आहे. त्यातच आता केंद्र सरकारने चाचण्यांवरुन मोठा यू टर्न घेतला आहे. सरकारने कोरोना चाचण्या मधील आरटीपीसीआर (RT PCR) चाचण्यांचं प्रमाण 70 टक्क्यांवरुन 40 टक्के करण्याचा विचार सुरु केला आहे. कोरोना चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचणी सर्वाधिक विश्वसनीय मानली जात असताना आता सरकारने याचे प्रमाण कमी करण्याचे ठरवले आहे.
कोरोनाचे निदान करण्यासाठी करण्यात येणाऱ्या एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण 70 टक्के असले पाहिजे, असं स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. मात्र आता आरटीपीसीआर चाचण्या 40 टक्क्यांवर आणून अँटिजन चाचण्यांचे प्रमाण 60 टक्क्यांवर नेण्याची तयारी सरकारने सुरु केली आहे. जूनच्या अखेरपर्यंत दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण 45 लाख करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यापूर्वी राज्यांना एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 70 टक्के असायला पाहिजे असे सांगितले होते. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी चालेल. तुमच्यावर कोणताही दबाव नाही, असे मोदी म्हणाले होते. आता सरकारनं आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता कमी केली आहे. मागील आठवड्यात दिवसांकाठी 16 लाख आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात होत्या. आता याची क्षमता कमी करण्यात आली आहे. ती 12 ते 13 लाखांवर आणण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारनेच ही आकडेवारी दिली आहे.
सरकारने जून अखेरपर्यंत आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 18 लाखापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. परंतु त्यावेळी एकूण चाचण्यांची संख्या 45 लाख इतकी असेल. याचा अर्थ एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण केवळ 40 टक्के असणार आहे. आरटीपीसीआरच्या गोल्ड स्टँडर्ड टेस्टऐवजी स्टँडर्ड टेस्ट करण्याचा सरकारचा इरादा आहे. काल आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली. एप्रिल-मे महिन्यांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्टचे प्रमाण 50-50 टक्के होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.