मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजपमध्ये तू-तू, मै-मै झाल्यावर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. त्यांनतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. शिवसेने असा धक्का दिल्यावर भाजप आता नवीन मित्रपक्षाच्या शोधात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो एकाच बॅनरवर दिसून आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. पालघरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ७ जानेवारीला मतदान होणार आहे. पालघरमधील वाडा पंचायत निवडणुकीच्या भाजप उमेदवाराने राज ठाकरे यांचा फोटो बॅनरवर लावला आहे. त्यामुळे त्यांच्यात जवळीक वाढली आहे का? ही उत्सुकतेची बाब आहे.
सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यांच्या महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. नाशिक महानगरपालिकेत मनसेने भाजपला मदत केली तर केडीएमसीच्या स्थायी समिती सभापती निवडणुकी वेळीही भाजप उमेदवाराला मनसेने साथ दिली.
शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्याने मनसे-भाजप हे जवळ येत असल्याचे दिसून येत आहे. पण २३ जानेवारीला मुंबईत मनसेचे अधिवेशन होणार असून त्यात ते काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा आणि विधासभा निवडणुकीत राज यांनी मोदी आणि शहांविरुद्ध अनेक वक्तव्ये केली होती. परंतु शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे विरोधी पक्ष आल्यामुळे राजकारणात कधीही काहीही होऊ शकत, याची थोडीफार कल्पना अनेकांना आली आहे.