मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाच्या मतांवर डोळा ठेवून तसेच ओबीसी समाजाचा रोष नको म्हणून सरकारने नवा वर्ग केला. पण हा नवा वर्ग घटनाबाह्य आहे,’ असा युक्तीवाद कोर्टात श्रीहरी अणे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकाकर्त्यांची बाजू मांडत असताना अणे यांनी हा दावा केला आहे.
मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीच्या आजच्या दुसरा दिवशी याचिकर्त्यांनी बाजू मांडली आहे. ‘मराठा आरक्षणाचा आराखडा चुकीचा असून या समाजाला आरक्षण दिल्यास इतर समाजावर अन्याय होईल. मराठा समाजाला सरकारने वेगळं आरक्षण फक्त यासाठी दिलं की ओबीसीमध्ये असलेल्या जातींचा रोष सरकारला नको होता,’ असंही श्रीहरी अणे यांनी कोर्टात म्हटलं आहे.
‘घटनेने आरक्षणासाठी एससी , बीसी आणि ओबीसी असे तीन वर्ग करून दिले असतील तर राज्य सरकार एसईबीसी हा चौथा वर्ग कसा तयार करू शकतो?’ असा सवालही राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरे अणे यांनी केला आहे.
दरम्यान, सरकार आणि मराठा समाजाच्या बाजूने 20, 21 आणि 22 फेब्रुवारीला बाजू मांडण्यात येणार आहे. त्यामुळे आता या सुनावणीत पुढे काय होतं, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.