नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही दिवसांमध्ये नागरिकत्व कायद्याविरुद्ध भाषण करताना जेएनयू विद्यापीठाचा विदयार्थी शर्जील इमाम याने आसामला भारतापासून तोडायचे वक्तव्य केले होते. आता शर्जीलला भाजपने घेरत ‘शर्जील सारख्या लोकांना चौकात उभे करून गोळ्या घातल्या पाहिजेत,’ असे वक्तव्य भाजपचे उत्तर प्रदेशचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे.
शर्जीलने अलिगड मुस्लिम विद्यापीठात २५ जानेवारीला वादग्रस्त भाषण करत आसामला भारतापासून तोडण्याचा इशारा दिला होता. तसेच असे वक्तव्य केल्याबद्दल त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता पण त्याला बिहारच्या जेहानाबाद येथून अटक करण्यात आले होते. सध्या तो दिल्ली पोलिसांच्या कोठडीत असून पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली आहे.
तर भाजपाचे संगीत सोम यांनी शर्जीलवर निशाणा साधत ‘देश तोडण्याची भाषा करणाऱ्या शर्जीलसारख्या लोकांना भर चौकात फासावर लटकावून गोळ्या घातल्या पाहिजेत. अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत माफ करता कामा नये,’ असे म्हणाले आहेत.