मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – अयोध्यतील राम मंदीर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि नाही आला तरी २१ फेब्रुवारीला राम मंदीराच्या बांधकामास सुरुवात होईल, असे आरएसएसचे मोहन भागवत यांनी जाहीर केले. नुकत्याच चार राज्यातील निवडणुकीचे निकाल आल्यानंतर त्यांनी मंदीर बांधण्याची घोषणा केली. कारण त्यांना हिंदु – मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे. या दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून बहुजन वंचित आघाडीच्या वतीने २१ फेब्रुवारीनंतर परिस्थिती बिघडू नये म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शांती मार्च काढण्यात येणार आहे. या शांती मार्चमध्ये सामाजिक घटक, संघटना स्वत:च्या फलकांवर आमच्या जिल्ह्यात जातीय दंगल होऊ देणार नाही, अशी ग्वाही देणार असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
येणाऱ्या निवडणुकीत दंगल
आगामी निवडणुकीमध्ये दंगल होणार असल्याचा अहवाल अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने जाहीर केला. याचा संदर्भ देत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, नुकतेच कल्याण येथील भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये मोठा शस्त्रसाठा सापडला होता. पण सरकारने ती चौकशी दाबून टाकली. भारतीय गुप्तचर यंत्रणेने असाच अहवाल सरकारकडे सादर केला मात्र तो अहवाल समोर आला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.